गुलाम नबी आझादांविषयी सांगताना पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात तरळले अश्रू

गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. चारही सदस्य जम्मू काश्मिरचे प्रतिनिधित्व करतात. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत असताना भावूक झाले. दहशतवादी हल्ल्यानंतरची आझाद यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना मोदींच्या डोळ्यात अश्रू तरळले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गुलाम नबी आझाद यांची क्षमता जम्मू काश्मीर आणि देशाच्या उपयोगी पडेल. गुलाम नबी आझाद यांच्यानंतर जे कुणी हे पद सांभाळेल त्यांना गुलाम नबी यांच्यासारखे राहताना अडचण येतील. कारण गुलाम नबी आझाद हे पक्षाबरोबरच देशाची आणि संसदेचीही काळजी करायचे. त्यांनी देशाला प्राधान्य दिले. मी शरद पवार यांनाही याच श्रेणीत बघतो. 28 वर्षांचा कार्यकाळ हा खूप मोठा असतो, असेही मोदी म्हणाले.
जेव्हा गुजरातमधील यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला झाला होता. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला गुलाम नबींचा सर्वात आधी फोन आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर मी तत्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. त्यांना मृतदेह आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्था करतो असे सांगितलं. त्यानंतर रात्रीही ते विमानतळावर होते. गुलाम नबी यांनी विमानतळावरून पुन्हा कॉल केला. त्यावेळी एखादा माणूस जसा कुटुंबातील व्यक्तीची चिंता करतो, तशीच चिंता ते करत होते. पद, सत्ता जीवनात येत-जात असतात. ती सांभाळता आली पाहिजे. माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन करून विचारले सगळे लोक पोहोचलेत ना? आझाद यांच्याशी माझे कायम मैत्रीचे नाते आहे. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका केला परंतु त्यांच्याविषयी माझ्या मनात कायमच आदर आहे, असे सांगताना पंतप्रधान मोदींचे डोळे भरून आले.