सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन बहिणीचा बंधाऱ्यात बुडुन मृत्यू. -माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील घटना
माजलगाव /रविकांत उघडे
दि.3 जुन – मावशीकडे आलेल्या दोन मावस बहिणीचा गोदावरी बंधाऱ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार दि.3 जुन रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटना माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे घडली.
माजलगाव (Majalgoan) तालुक्यातील महातपुरी येथे सुट्ट्या असल्याने काही दिवसापूर्वी गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील दिपाली गंगाधर बरबडे ( 20 ) व आनंदगाव ता. परतुर येथील स्वाती अरुण चव्हाण ( 12 ) या मावस बहिणी आपल्या मावशीकडे आल्या होत्या. त्या दररोज मावशी व आपापल्या आईसोबत गोदावरी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी जात असत. यावेळी त्या आंघोळ देखील करत असत.
शुक्रवारी सकाळी त्या आई व मावशी सोबत नदीवर गेल्या असता स्वाती आंघोळ करत असताना पाण्यात बुडत (drowned) असल्याचे पाहून दिपालीने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दिपाली देखील पाण्यात बुडू लागली. त्या दोघी पाण्यात बुडत असल्याने उपस्थित असलेल्या महिलांनी आरडाओरड केली. आवाजामुळे आजूबाजूचे लोक धावून आले. मदतीसाठी लोकं येईपर्यंत दोघी पाण्यात बुडाल्या.
यावेळी पाण्यात दोघींचा शोध घेत असताना जवळपास एक तास लागला. त्यांना वर काढून तात्काळ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी या दोघींना मृत झाल्याचे घोषित केले. मृत बहिणींचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांकडे त्यांचे पार्थिव सुपूर्द करण्यात आले. लक्ष्मण रामभाऊ शिंगाडे यांच्या खबरीवरून माजलगाव पोलिसांत (Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पो.काँ. माणिक राठोड हे करत आहेत.